वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात १८ मे रोजी डोलखांबमध्ये श्रमजीवी संघटनेचा आक्रोश मोर्चा

चंद्रकांत देसले /शहापूर

शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा सतत मुक्त वावर सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे तीव्र वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी कलभोंडे गावातील १० वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी वारंवार निवेदने, तक्रारी व मागण्या करूनही संबंधित बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
डोळखांब परिसरातील अनेक आदिवासी व ग्रामीण कुटुंबांचा उदरनिर्वाह जंगलावर अवलंबून आहे. करवंदे, आंबे, आवळा, जांभूळ तसेच विविध वनउत्पादने गोळा करून विक्री केल्याने अनेक कुटुंबांचा संसार चालतो. मात्र बिबट्याच्या सततच्या भीतीमुळे नागरिक जंगलात जाण्यास धजावत नसल्याने अनेक कुटुंबांचा रोजगार पूर्णपणे ठप्प झाला असून आर्थिक संकट अधिक तीव्र झाले आहे. याच काळात आदिवासी बांधवांकडून शेतीपूर्व भाजणी, पालापाचोळा गोळा करणे, शेती मशागत व पावसाळ्यापूर्व तयारीची कामे केली जातात. परंतु जंगल परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीची पूर्वतयारी रखडली असून आगामी हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वन विभागाने परिसरात कॅमेरे बसवले असून त्यामध्ये बिबट्याची हालचाल स्पष्ट दिसून येत असतानाही प्रभावी व तातडीची कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महिला, लहान मुले व शेतकरी यांच्यामध्ये सतत भीतीचे वातावरण असून नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला आहे.

तसेच शहापूर तालुक्यासारख्या विस्तीर्ण वनक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी रेस्क्यू टीम नसणे ही गंभीर बाब असल्याचे श्रमजीवी संघटनेने म्हटले आहे. प्रत्येक वेळी मुंबई-बोरिवली येथील रेस्क्यू टीमची प्रतीक्षा करावी लागत असल्याने स्थानिक पातळीवर स्वतंत्र रेस्क्यू यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. घटना घडून तब्बल 20 दिवस उलटूनही वन विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली आहे. शहापूर तालुका हा शंभर टक्के पेसा क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत प्रशासन आदिवासी बांधवांच्या भीती व समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भावना व तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने दिनांक १८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वनपरिक्षेत्राधिकारी, डोळखांब वनपरिक्षेत्र कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार असून प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. मालू हुमणे व तालुका सचिव श्री. प्रकाश खोडका यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित निवेदन देताना ग्रामपंचायत कळभोंडेचे पोलीस पाटील भालचंद्र खडके, ग्रामस्थ सोमनाथ वाघ, श्रमजीवी संघटनेचे तालुका कार्यालयीन सचिव कमलाकर शिंदे, डोळखांब गट अध्यक्ष राम हिलम तसेच गट सचिव गोपाळ हंभीर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *