मांडा-टिटवाळा येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रारंभीचे कार्यक्रम यशस्वी

टिटवाळा: अजय शेलार 

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मांडा-टिटवाळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य जयंती उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रारंभीचे कार्यक्रम उत्साहात पार पडले आहेत. बहुजन उत्थान सेवा समिती आणि भारतीय बौद्ध महासभा, मांडा टिटवाळा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या चार दिवसीय उत्सवामुळे परिसरात सामाजिक जागृती, समता आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित विचारमंथन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी फुले-आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक परिवर्तनाचा संदेश आत्मसात केला. वक्त्यांनी शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरित केले.

दरम्यान, आज १२ एप्रिल रोजी संवाद नाट्य अकॅडमीच्या माध्यमातून लघुनाट्य आणि कथन कार्यक्रम संपन्न होत असून, समाजातील वास्तवावर प्रकाश टाकणाऱ्या या सादरीकरणामुळे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा अनुभव मिळत आहे. सांस्कृतिक माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा आयोजकांचा प्रयत्न यामधून स्पष्टपणे दिसून येत आहे.

तर १३ एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विशेषतः तरुणांना विचारमंच उपलब्ध करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जाणीवा दृढ करण्यासाठी या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणारी भव्य पारंपरिक मिरवणूक १४ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली असून, संविधान चौक, जानकी विद्यालय , वासुंद्री रोड ते वाजपेयी चौक असा या मिरवणुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध घटक या मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने मांडा-टिटवाळा परिसरात उत्साहाचे वातावरण अधिकच वाढले आहे.

या संपूर्ण उत्सवामध्ये महिला समिती, युवक वर्ग आणि स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत असून, जयंती उत्सव केवळ औपचारिक न राहता सामाजिक ऐक्य, जागृती आणि परिवर्तनाचा प्रभावी संदेश देणारा ठरत आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होऊन डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीतच, मांडा-टिटवाळा येथील हा जयंती उत्सव समाजप्रबोधनाचा मजबूत पाया घालणारा ठरत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *