पाऊस लांबल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शेतकरी चिंतेत

शहापूर प्रतिनिधी: चंद्रकांत देसले

मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाने पाठ फिरवल्याने शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे पेरणीची तयारी पूर्ण झाली असताना दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. हिरवागार चारा उगवण्याची वेळ उलटून गेली, मात्र आभाळ कोरडेच असल्याने शेतातील कुरणे ओस पडली आहेत. परिणामी शेतकऱ्यांसमोर जनावरे जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शेतकरी वर्षभर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जनावरांची काळजी घेतो. दूध व्यवसाय, शेतीची कामे आणि आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असलेले हे पशुधन आज चाऱ्याअभावी त्रस्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरातील चाऱ्याचे कोठार रिकामे होत चालले असून साठवून ठेवलेला कडबा आणि भुसाही संपण्याच्या मार्गावर आहे. बाजारात चाऱ्याचे दर गगनाला भिडल्याने तो विकत घेणेही अनेकांना परवडेनासे झाले आहे.
पावसाअभावी ओढे, नाले, तलाव आणि विहिरींची पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक गावांमध्ये पशुपालकांना मैलोनमैल अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यातच दिवस जात असल्याची व्यथा शेतकरी मांडत आहेत.
यंदाच्या हंगामाकडून मोठ्या अपेक्षा असलेल्या बळीराजाची स्वप्ने सध्या धूसर होताना दिसत आहेत. शेतकरी रोज आभाळाकडे आशेने पाहतो, परंतु काळे ढग येतात आणि निघून जातात. पावसाचा एक थेंबही न पडल्याने शेतकरी कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणी रखडली आहे, जनावरांचा चारा संपत आहे आणि आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *