महावितरणचे कंत्राटदार तुपाशी तर कामगार उपाशी

“सरकार जगाओ” आंदोलनाच्या दुसऱ्या टप्यात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कल्याण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने करावी, महाराष्ट्रात देखील हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार मुक्त जॉब सिक्युरिटी द्यावी,वेतनात वाढ करावी, वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात वाढ, आरक्षण व मार्क द्यावेत इत्यादि मागण्या करिता “सरकार जगाओ” आंदोलनाच्या दुसऱ्या टप्यात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा तर्फे शुक्रवारी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

राज्यभर कंत्राटी कामगारांचे कंत्राटदारांच्या मार्फत होत असलेले आर्थिक शोषण व त्यास अधिकाऱ्यांचे अभय व संगनमत असल्याने कष्टकरी कामगाराला पूर्ण वेतन मिळत नाही, बोनस नाही, पेमेंट स्लीप नाही, डोक्यावर सतत रोजगाराची टांगती तलवार, जीव कधी जाईल सांगता येत नाही अपघात झाल्यास विमा नाही या बिकट अवस्थेत कामगार वर्षानुवर्षे सेवा देत आहे.

कामगारांच्या वेतनात वाढ करून हरियाणा सरकार प्रमाणे मध्यस्थी कंत्राटदारांना बाजूला सारून उपकंपनी तर्फे थेट कामगारांच्या बँक खात्यात वेतन देऊ असे आश्वासन डिसेंबर 2023 नागपूर अधिवेशनात ऊर्जामंत्री फडणवीसांनी देऊन सुद्धा त्याची पूर्तता न झाल्याने कामगार वर्गात तीव्र नाराजी आहे. कंत्राटदार तुपाशी व कामगार उपाशी अशी वेळ आल्याने तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगार अन्यायाला वाचा फोडुन सरकारला जागे करण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून विधानसभा अधिवेशना दरम्यान 9 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन करणार आहे.

अवर प्रधान सचिव ऊर्जा व कामगार यांनी मीटिंग घेऊन तोडगा काढावा ऊर्जामंत्री यांनी दिलेले आश्वासन पाळावे अशी अपेक्षा महामंत्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली असल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे कल्याण परिमंडळ अध्यक्ष मनोज मनुचारी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *