वरळी येथे 158 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

Img4

कल्याण : कुणाल म्हात्रे 

‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या उदात्त भावनेतून संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने खेडगल्ली म्युनिसिपल स्कूल, वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 158 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले मार्फत रक्त संकलन करण्यात आले.

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी यांचे कथन आहे, की जीवन तेव्हाच महत्वपूर्ण ठरते जेव्हा ते इतरांसाठी जगले जाते. हीच शिकवण धारण करुन निरंकारी भक्त निष्काम भावनेने निरंतर मानवतेच्या सेवेमध्ये आपले योगदान देत असतात. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाच्या दादर विभागाच्या संयोजक पूजा चुघ यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अनेक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्यांमध्ये आमदार महेश सावंत, माजी नगरसेवक संतोष धुरी आणि शिवसेना विभाग प्रमुख आशिष चेंबुरकर उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखी दिनेश गवळकर यांनी स्थानिक सेवादल युनिट आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *