जनसेवेचे व्रत घेणारा एक निष्ठावान कार्यकर्ता
विजय भाऊ मारुती देशेकर हे नाव मांडा-टिटवाळा परिसरात सर्वपरिचित , विश्वासार्ह आणि निष्ठावान नेतृत्व म्हणून उभे आहे. त्यांनी आपल्या आयुष्याला जनतेच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. शिवसेना उपशहरप्रमुख, टिटवाळा महोत्सवाचे आयोजक, आणि के-३ रेल्वे प्रवासी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष म्हणून विजय भाऊंनी आपल्या कार्यकौशल्याने आणि सेवाभावनेने परिसरातील हजारो नागरिकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. टिटवाळ्यातील एक प्रभावी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून परिचित विजयभाऊ देशेकर त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्याचा मागोवा घेतल्यास, त्यांचे योगदान फार मोठे आहे .

टिटवाळा महोत्सव: एक प्रेरणादायी उपक्रम
विजयभाऊंच्या नेतृत्वाखाली संकल्प प्रतिष्ठानने गेली ९ वर्षे सलग “टिटवाळा महोत्सव” हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या महोत्सवाने टिटवाळ्यातील सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक चैतन्य वाढवले आहे. या महोत्सवाने केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांचाच नव्हे तर लोकजागृती आणि समाजसेवेचा महत्वपूर्ण पाया घातला आहे. विजय भाऊंनी या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणून एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला आहे.

जनतेसाठी कार्यशीलता आणि वचनबद्धता
विजयभाऊंच्या कामाची खरी ओळख म्हणजे नागरिकांच्या समस्यांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका. शाळांच्या मनमानी कारभारावर टीका करून त्यांनी शैक्षणिक व्यवस्थेला सुसूत्र केले. पाणी प्रश्नांवर आंदोलन करत त्यांनी टिटवाळ्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून दिला. विजेच्या समस्यांवर आवाज उठवून सामान्य नागरिकांना दिलासा मिळवून दिला. याशिवाय, गॅस सिलिंडर वितरणातील विलंबावरून त्यांनी ग्राहकांच्या समस्यांना वाचा फोडली. विजय भाऊंनी मांडा-टिटवाळा परिसराच्या विकासासाठी झोकून देऊन काम केले आहे. त्यांनी रस्त्यांची सुधारणा, उड्डाणपुलांची उभारणी, आणि विविध मूलभूत सुविधांची पूर्तता यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मांडा पश्चिम येथील रस्त्यासाठी तब्बल १७ कोटींचा निधी मंजूर व मांडा पूर्व-पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाचे पूर्णत्वास गेलेले काम यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांनी एमएमआरडीएमार्फत अनेक प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला चालना देत परिसरातील डीपी रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. कोविड महामारीच्या काळातही त्यांनी आपल्या पातळीवर जनतेसाठी अतिशय मोलाचे असे कार्य केले.

एक अभ्यासू, निष्ठावान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
विजय भाऊंचे व्यक्तिमत्त्व हे जनतेशी जोडलेले आहे. ते केवळ राजकीय नेतृत्वच नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारे, लोकांच्या समस्यांची जाण असलेले खरेखुरे जनसेवक आहेत. त्यांची राजकीय दूरदृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्व या क्षेत्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी सक्षम आहे. टिटवाळ्याच्या विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या यशस्वी निवडणुकीत विजयभाऊंनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि प्रभावी नेतृत्वामुळे मतदारांशी संपर्क सुसंवाद साधला गेला. जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख बनत गेली . सामान्य जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी उपोषणाचा मार्ग पत्करला. त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण होऊन अनेक प्रश्न मार्गी लागले. विजय भाऊंचा राजकीय आणि सामाजिक प्रवास साध्या लोकांच्या समस्यांपासून प्रेरित आहे. ते सुरुवातीपासूनच जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी तत्पर राहिले आहेत. अनेक समस्यांचे निराकरण करत, परिसरातील विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्याचा प्रयत्न केला.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !
आज विजय भाऊंचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने मांडा-टिटवाळा परिसरातील नागरिक त्यांना शुभेच्छा देत आहेत. विजय भाऊंनी आजवर आपल्या प्रयत्नांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्यांचे जीवन कार्यकर्तृत्वाने संपन्न आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश कायमच प्रेरणा देत राहील.
विजय भाऊंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
















Leave a Reply