निलेश कासट-पुणे (खेड)
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, टोकावडे येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालकांसाठी संस्मरणीय ठरला.
शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रभातफेरीने झाली. या फेरीमध्ये “धरती आबा जनभागीदार अभियान” अंतर्गत विविध घोषणा देत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेतील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना “धरती आबा जनभागीदार अभियान” याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच शासनामार्फत नव्याने नेमण्यात आलेल्या नर्स राजश्री मुंडे यांचे औपचारिक स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती, खेडचे माजी सभापती विठ्ठलजी वनघरे हे होते. कार्यक्रमाला टोकावडे ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती ताई मोरमारे, मंदोशीचे सरपंच एकनाथ तळपे, सदस्य भरत डामसे, बाळासाहेब मदगे, अंकुश शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास कोकाटे, मनोहर शिंदे,पार्वताबाई वनघरे, शांताराम कोकाटे, संदीप कोकाटे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पदवीधर प्राथमिक शिक्षक सुधाकर रोडगे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्राथमिक शिक्षकसु. ग. शिंदे यांनी केले.















Leave a Reply