मुख्यालयासमोरच मोबाईल टॉवर ; नागरिक संतप्त, आरोग्य धोक्याच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर

कल्याण : रोशन उबाळे 

कल्याण शहराच्या मध्यभागी, महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरने नव्या वादाला तोंड फोडले आहे. शंकरराव चौकातील वाहतूक बेटावर उभारलेल्या या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा, निवासी इमारती आणि ज्येष्ठ नागरिकांची वस्ती अशा संवेदनशील परिसरात अशा प्रकारची उभारणी करण्यात आल्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणोत्सर्गामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात, अशी ठाम भूमिका स्थानिकांनी मांडली आहे.

सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या निर्णयाविरोधात एकत्र आले असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहर विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जाऊ नये, असा आरोप करत संबंधित परवानगी प्रक्रियेची पारदर्शकता तपासण्याची मागणीही पुढे आली आहे. वाहतूक बेटासारख्या सार्वजनिक जागेवर टॉवर उभारण्यामागील तांत्रिक निकष आणि सुरक्षा उपायांविषयी प्रशासनाने खुलासा करावा, असा सूर आंदोलनकर्त्यांनी लावला आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते वल्ली राजन, दिनेश परदेशी, संतोष पाटील, गोरक्ष शिंदे आणि तोषेश लक्ष्मीपती शुक्ला यांनी महापालिका आयुक्त अभिजीत गोयल यांना निवेदन सादर केले. सद्य परवानगीचा फेरआढावा घेऊन टॉवरची जागा बदलावी आणि पर्यायी, सुरक्षित ठिकाण निश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, असा त्यांचा आग्रह आहे.

महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच निर्माण झालेला हा वाद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरतो आहे. विकासाच्या गरजा आणि सार्वजनिक आरोग्य यांचा समतोल राखण्यात प्रशासन कितपत सजग आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी ठोस आणि पारदर्शक निर्णयाचीच आता अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *