कार्ला एकविरा देवस्थान मारामारी; चैत्र यात्रेत दोन गटांत दगडफेक, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण


पालखी प्रस्थानावरून पनवेल-कल्याण कोळीवाडा गटांत संघर्ष; पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात

मुंबई प्रतीनिधी: (सतिश पाटील)


कार्ला येथील एकविरा देवस्थानातील चैत्र यात्रेदरम्यान (२६ मार्च २०२६) मध्यरात्री पालखी प्रस्थानाच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या कार्ला एकविरा देवस्थान मारामारी प्रकरणाने खळबळ उडाली. पनवेल व कल्याण कोळीवाड्यातील तरुणांमध्ये हा वाद उफाळून आला , पालखी पुढे नेण्याच्या कारणावरून , लोणावळ्यातील कार्ला परिसरात  रात्री उशिरा दगडफेक व हाणामारीच्या स्वरूपात घडला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

पालखी प्रस्थानावरून वाद, दगडफेकीत रूपांतर

चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी असताना पालखी पुढे नेण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद क्षणातच उग्र होत दगडफेक व एकमेकांवर हाताला मिळेल ते फेकण्यापर्यंत पोहोचला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांचा हस्तक्षेप; परिस्थिती नियंत्रणात

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या मारामारीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात्रेसारख्या धार्मिक सोहळ्याला गालबोट लागल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे. पुढील दिवशीही काही प्रमाणात बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 जुना वाद पुन्हा उफाळला; प्रशासनाकडून उपाययोजनांची अपेक्षा

सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही गटांमध्ये जुना वाद असल्याचे समोर आले आहे. देवदर्शनासाठी येणाऱ्या कुटुंबीयांसमोर अशा घटना घडणे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन व देवस्थान ट्रस्टने कडक उपाययोजना कराव्यात, तसेच अशा प्रकारांना कारणीभूत ठरणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून सध्या परिसरात शांतता असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *