टिटवाळा :
भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा यशस्वी खात्मा आणि देशाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा शहरात आज ‘तिरंगा पदयात्रा’ उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडली. शाळेतील विद्यार्थी , स्काउट गाइडचे युनिट , सैन्यदलातले निवृत्त अधिकारी तसेचकर्मचारी याचबरोबर टिटवाळ्यातील बहुसंख्य नागरिकांनी उत्स्फुतपणे या रॅलीत उपस्थिती लावली होती .
ही पदयात्रा आज संध्याकाळी ६ वाजता स्वामी विवेकानंद चौक (निमकर नाका) येथून सुरू झाली. शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रॅली वाजपेयी चौक, स्टेशन रोड मार्गे पुन्हा स्वामी विवेकानंद चौक येथे पोहोचली, जिथे तिचा समारोप करण्यात आला. पदयात्रेदरम्यान “भारतीय जवान अमर रहें”, “वंदे मातरम्”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या माध्यमातून नागरिकांनी भारतीय सैनिकांच्या शौर्याला सामूहिक मानवंदना दिली आणि त्यागाची जाणीव सर्वांना करून दिली.

या उपक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर उपेक्षा भोईर तसेच टिटवाळा येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार कपिल पाटील यांनी प्रमुख्य उपस्थिती लावत या पदयात्रेत हाती तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या शौर्याचे स्मरण सतत व्हावे, यासाठी ही पदयात्रा एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग हे देशप्रेमाचे प्रतीक आहे.” शेवटी, सर्वांनी तिरंगा ध्वज फडकवून आणि राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता केली. या उपक्रमामुळे टिटवाळा शहरात देशप्रेम, ऐक्य आणि अभिमानाची भावना अधिक बळावली असल्याचे नागरिकांनी सांगितले.













Leave a Reply