जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीचा फटका : उद्या कल्याण–डोंबिवलीत आठ तासांचा पूर्ण शटडाऊन; नागरी-ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना पाणीकपातीचा मोठा झटका

Whatsapp image 2026 01 23 at 9.00.51 am

टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाअंतर्गत येणाऱ्या बारावे-मोहीली–नेतीवली तसेच टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवर विद्युत व यांत्रिक उपकरणांच्या अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून ते रात्री ६ वाजेपर्यंत तब्बल आठ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पूर्ण शटडाऊनचा थेट फटका कल्याण-डोंबिवली शहरासह ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना बसणार असून, संपूर्ण परिसरात तीव्र पाणीकपातीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, मोहीली व नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रांतील विद्युत यंत्रणा, पंप, यांत्रिक उपकरणे तसेच तांत्रिक प्रणालींची तातडीची दुरुस्ती व देखभाल करण्यात येणार आहे. ही कामे सुरळीत व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी अत्यावश्यक असल्याने संपूर्ण यंत्रणा बंद ठेवून दुरुस्ती करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत पूर्ण शटडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पाणीबंदीचा परिणाम टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्व व पश्चिम भागावर तसेच डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरावर होणार आहे. त्याचबरोबर कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, आंबिवली, शहाड, अटाळी आदी परिसरांनाही या पाणीपुरवठा बंदीचा मोठा फटका बसणार आहे. नागरी व ग्रामीण भागात एकाचवेळी पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना आधीच सतर्कतेचा इशारा देत पाणी साठवणूक करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पाणीबंदीच्या कालावधीत अनावश्यक वापर टाळावा, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा आणि परिस्थितीची जाणीव ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुरुस्ती भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत, सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी अत्यावश्यक असून ती तातडीने करणे गरजेचे होते. त्यामुळे नागरिकांनी गैरसोयीबाबत संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

एकूणच बारावे-मोहीली–नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीमुळे उद्याची पाणीबंदी तात्पुरती असली, तरी तिचा परिणाम व्यापक स्वरूपाचा ठरणार असून, कल्याण-डोंबिवली शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना उद्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *